जिल्हा दहशतमुक्त आहे तर तुम्हाला शस्त्राची गरज का? मंत्री केसरकर यांना राऊळ यांचा सवाल…

72

राजू तावडे / सावंतवाडी :- दहशतवादाचा आरोप केलेल्या नेत्याचे तुम्ही आता गुणगान गाता. मग आता बंदूक का बाळगता? तुम्हीच सिंधुदुर्ग दहशतवाद मुक्त झाला म्हणता मग तुम्हाला बंदुक परवान्याची गरज काय? असा सवाल उद्धव सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून मंत्री केसरकर यांना केला आहे.

दहशत-दहशतवाद म्हणून कायम भुई थोपटणार्‍या शालेय शिक्षण मंत्र्याकडे बंदुक परवाना आहे, हे उघड करून प्रशासनानेच केसरकर यांच्या थंड दहशतीचे पितळ उघडे पाडले, असा आरोप राऊळ यांनी केला आहे.

जर खरोखरच जिल्हा दहशतमुक्त आहे तर तुम्हाला शस्त्राची गरज का लागते? हे केसरकर यांनी सर्वसामान्य जनतेला सांगणे गरजेचे आहे. दहशत..दहशत म्हणून दोन विधानसभा निवडणुका लढवणारे केसरकर त्याच नेत्या सोबत हातमिळवणी करून मांडीला मांडी लावून बसत आहेत. केसरकर यांनी जनकल्याणाच्या योजना राबविल्या नाहीत, तसेच रोजगारही उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे सोज्वळ चेहरा घेऊन वावरणाऱ्या केसरकर यांच्याकडील शस्त्र पोलीस ठाण्यात जमा करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश पारित केले आहेत. त्यामुळे केसरकर यांचे आणखी एक पितळ उघडे पडले आहे, असे रूपेश राऊळ यांनी सांगितले.

केसरकर यांच्या भूलभुलैया, भूलथापांना बळी पडणारे लोक आता त्यांचा खरा चेहरा ओळखून आहेत. त्यामुळे केसरकर मतदारसंघातही फिरत नाहीत. फक्त पत्रकार परिषद घेऊन अवसान निर्माण करत आहेत, असे राऊळ यांनी सांगितले.

हत्ती, गवा रेडा, वन्यप्राणी लोकवस्ती मध्ये घुसून शेती बागायतीचे प्रचंड नुकसान करत आहेत. त्या शेतकऱ्यांना शस्त्र परवाना मिळवताना नाकेनऊ येतात. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शेतकरी बागायतदार यांना शस्त्र परवाना नुतनीकरण करून देण्यासाठी मोठा मानसिक त्रास दिला तेव्हा केसरकर गप्प बसले. मात्र स्वतः साठी बंदुक शस्त्र परवाना मिळवला यावरून केसरकर यांचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. केसरकर यांना शेतकरी बागायतदार यांच्या समस्यांचे देणेघेणे नाही हेही वेळोवेळी समोर आले आहे ,असे राऊळ यांनी सांगितले.