सितराज परब / कणकवली :- कणकवली शहर आणि तालुक्यात आज सायंकाळी पाच वाजता मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे विक्रेत्यांची धावपळ उडाली. तर उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. सुमारे अर्धा तास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. आजच्या पावसासोबत फारसे वादळी वारे नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दोन दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रूक गावासह कळसूली, शिरवल, शिवडाव, साकेडी आदी गावांना चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला होता. यात सुमारे दीड कोटींची हानी झाली. त्यानंतर आज सायंकाळी पाच वाजल्यापासून मान्सूनपूर्व मुसळधार सरी कोसळल्या.