गौरवशाली ऐतिहासिक अशा शिराळा तालुक्यातील भूईकोट किल्ल्याच्या विकासाचा संकल्प – मंत्री जयंत पाटील…

22

 

मुंबई/प्रतिनिधी:-

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भूईकोट किल्ल्याच्या विकासाचा संकल्प केला असून त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सांगितले. शिराळा तालुक्यातील भूईकोट किल्ल्याच्या विकासासंदर्भात आज मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली खा. अमोल कोल्हे समवेत बैठक संपन्न झाली.

या वेळी मंत्री जयंत पाटील म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर, महाराजांची सुटका करण्यासाठी याच किल्ल्यावर प्रयत्न झाला होता. हे या किल्ल्याचे महत्त्व आहे. शंभूराजांच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी व्हावी. या करिता किल्ल्याचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे.किल्ल्याबाबत खा. अमोल कोल्हे यांनीही महत्त्वपूर्ण सुचना केल्या.

या वेळी जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे, महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती देणारे, शिवसंस्कार सृष्टी स्मारक बनवण्याची खा. डॉ. अमोल कोल्हे व आ. अतुल बेनके यांची संकल्पना आहे. याबाबतीतही यावेळी चर्चा करण्यात आली.

या वेळी  खा. डॉ. अमोल कोल्हे, आ. मानसिंगराव नाईक, आ. अतुल बेनके आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.